डाॅ. बाबासाहेब आंबेडकर केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते किवा ते दलितांचे उद्धारक नव्हते, तर ते एक उच्च दर्जाचे शिक्षणतज्ञही होते. त्यांच्या दृष्टिकोनात माणसाला जीवनात शिक्षणाची अतिशय आवश्यकता आहे. पण शिक्षणासोबत सद्गुणाकडे त्यांचा ओढा होता. 3 जून 1953 रोजी रावळी कँप,मुंबई येथे एका महिला मंडळासमोर भाषण त्यांनी स्पष्ट केले: आपण शिकलो म्हणजे आता सर्व काही झाले, असे नाही. शिक्षणाचे मनुष्याच्या जीवनात महत्व आहे यात शंका नाही; मात्र शिक्षणाबरोबर माणसाचे शीलही सुधारलेले असले पाहिजे. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. ज्ञान हे तलवारीसमान आहे. तिचा सदुपयोग किवा दुरोपयोग करायचा हा त्या त्या माणसाच्या शीलावर प्रामुख्याने अवलंबून असते. मनुष्य तलवारीने एखाद्याचा खुनही करु शकतो किवा एखाद्याचे संरक्षण करु शकतो. ज्ञानाचे तसेच आहे. एखाद्या शिकलेल्या मनुष्याचे शील चांगले असेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोककल्याणासाठी करीन. परंतु जर त्या माणसाचे शील भ्रष्ट असेल तर तो आपल्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या अकल्याणासाठी करु शकेल. शील हे धम्माचे मोठे अंग आहे. शिकलेली माणसें केवळ पोटभरू असून चालणार नाही, ती माणसें नुसती शिकली म्हणून काय झाले? त्यांचा दुस-याना काय उपयोग? तशीच गोष्ट धर्माची आहे.
माणसाने स्वार्थच करीत न बसता थोडाफार परमार्थही केला पाहिजे. यासाठी धर्माची गरज आहे. तुमच्यासाठी मी हे सर्व करीत आहे. मला हे धर्माने शिकविले. नुसते पोट भरले म्हणजे सर्व काही झाले असे समजू नका. पोट काय रांड बायाही भरतात. संत कबीराने म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने उद्दोग केला पाहिजे. स्वार्थ व परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी प्रत्येकाने साधल्या पाहिजेत. प्रथम घर सांभाळा आणि नंतर समाजकार्यालाही मदत करा. असा महत्वपुर्ण सल्ला त्यांनी यावेळी महिला मंडळाच्या सदस्यांना दिला. शेवटी त्यांनी सांगितले की, प्रत्येकाने आपल्या घरात बुद्धाची प्रतिमा लावावी.
भवतु सब्ब मंगलं !