दामोदर नदी, हिराकुंड धरण आणि सोन नदीवरील प्रकल्पदा
दामोदर नदी, हिराकुंड धरण आणि सोन नदीवरील प्रकल्प उभारणी आणि देशातील नद्या जोड प्रकल्प ही डॉ. बाबासाहेब आंबेडकराची देणगीच म्हणावी लागेल!
दामोदर नदी हि विनाशकारी नदी म्हणून ओळखली जाते. बिहार आणि बंगाल या दोन राज्यांना या नदीचा सर्वाधिक फटका बसतो. पुराची वारंवारीता तसेच मातीची प्रचंड धूप दोन्ही राज्यासाठी खर्चिक आणि तितकीच नुकसानदायक बाब ही नित्याची होती.
Dr. babasaheb ambedkar water policy
१९४२ मध्ये आलेल्या विनाशकारी महापुराने तर कोलकत्ता शहर पूर्णपणे प्रभावित झाले होते. रस्ते आणि रेल्वे मार्गाअभावी या शहराचा अन्य देशाशी/प्रदेशाशी पूर्णपणे संपर्क तुटला होता. संबंधित समस्या निवारण्यासाठी आणि उपाययोजना सुचविण्यासाठी बंगाल सरकारने "दामोदर नदी पूर नियंत्रण चौकशी समिती" 'नेमली होती. सरकार निर्देशित या समितीने पूर समस्या निवारण तसेच उपाययोजना व नियंत्रणासाठी चौकशी समितीने काही शिफारशी केल्या असल्यातरी त्या मर्यादित होत्या. त्यानुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कलकत्ता परिषदेत पूर नियंत्रणासाठी सूचित करताना पूर नियंत्रणासाठी उपखोऱ्यातील छोट्या-मोठ्या नद्यांवर धरणे बांधणी आणि पाणी अडविण्याबरोबरच त्या भागातील जंगल व मृदा संवर्धन करण्यासाठी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या तसेच दामोदर नदीवरील बांध बांधण्याचा हेतू हा केवळ पूर नियंत्रणापुरता मर्यादित न ठेवता दामोदर नदीचे पाणी हे शेती, विद्युत निर्मिती आणि जल मार्गासाठी कसे उपयुक्त ठरेल यावर सुद्धा त्यांनी अधिक भर दिला होता. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेतील टेनेसी व्हॅली योजनेचा स्वतः सखोल अभ्यास केला होता. अमेरिकेतील मियानी, मिसौरी आणि टेनेशी नद्या बाबत अमेरिका सारखा प्रगत देश प्रभावित होता. त्या अनुषंगाने कालांतराने केंद्रीय तांत्रिक ऊर्जा बोर्ड व केंद्रीय जलमार्ग, सिंचन आणि नौकायन आयोग स्थापन करण्याचे भारत सरकारचा मानस असल्याचे डॉ.आंबेडकर यांनी मत मांडले होते.
अशीच काहीशी स्थिती ओरिसा राज्याची होती. राज्यात महानदी, ब्राह्मणी आणि वैतरणी या तीन प्रमुख नद्यासह त्याच्या काही उपनद्या सुद्धा वाहतात. महानदी ओरिसा राज्यातील सर्वात मोठी नदी आहे. कटक, पुरी आणि बालासोर अशी तीन जिल्हे ज्यांचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे ८,००० वर्ग मैल आहे. नदीच्या खोऱ्यातील हे क्षेत्र नेहमीच पूर व नैसर्गिक संकटाने प्रभावित असे.
जुलै १९४३ मध्ये आलेल्या महापुराने (महानदीच्या)तर संपूर्ण राज्यात हाहाकार माजला होता अर्थात नदीखोऱ्यातील हे क्षेत्र नेहमीच पुराने तसेच नैसर्गिक आपत्तीने प्रभावित होत असे. राज्यात मुबलक नैसर्गिक संसाधने आणि जलस्त्रोत असताना सुद्धा योग्य नियोजना अभावी ओरिसा राज्याची दयनीय अशीच अवस्था होती.नद्यांना महापूर ही तर नित्याची बाब होतीच शिवाय या आपत्तींने जीवितहानी व वित्तहानी सुद्धा सहन करावी लागत असे. सोबतच विविध आजारासह मलेरिया सारखे आजार आणि पुराने बाधित कुटुंबाचे पुनर्वसन इत्यादी बाबीवर सरकारला दरवर्षी मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत असे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी पुरेसा वाव असतानासुद्धा आणि नैसर्गिक साधन संपत्ती उपलब्ध असताना सुद्धा हे राज्य मागासलेले होते.
ओरिसा राज्याच्या विकासासाठी आणि पुरासारख्या गंभीर संकटातून राज्याची कायमस्वरूपी मुक्तता व्हावी यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेरिकेतील टेनेशी व्हॅली योजनेचा सखोल अभ्यास केला होता. त्याच अनुषंगाने ओरिसा राज्य या संकटातून कसे बाहेर येईल आणि हे राज्य विकासाच्या मार्गावर कसे आरूढ होईल यादृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वोतोपरी शर्थीचे प्रयत्न केले होते आणि म्हणूनच त्यांच्या संकल्पनेतूनच १९५७ मध्ये महानदीवर हीराकुंड धरण पूर्णत्वास आले. हिराकुंड धरण हे जगातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळखले जाते.या धरणाचा ३,२४,००० हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. शेती सिंचनाखाली आली आहे पर्यायाने शेतकऱ्यांचा उत्पादनात वाढ झाली आहे, राज्य विकसिततेकडे अग्रेसीत होण्यास हातभार लागला आहे,
त्याचे श्रेय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जलनीतीलाच जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जल व्यवस्थापना बाबत घेतलेले धोरणात्मक निर्णय तसेच भारतातील पाणी व्यवस्था, सिंचन, जलवाहतूक नौकानयन, वीजनिर्मिती आणि वितरण सोबतच प्रकल्प बाधिताचे प्रश्न इत्यादी बाबतीतचे त्यांचे धोरण आणि प्रयत्न हे निश्चितच अद्वितीय आहे. त्यांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे दामोदर नदी खोरे प्रकल्प, महानदी वरील भाक्रा-नांगल धरण, सोन नदीवरील प्रकल्प, चंबळ नदी, पठारावरील खोरे, दख्खनच्या पठारावरील नद्याचे प्रकल्प इत्यादी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मार्गी लागले आहेत हे कोणीच नाकारणार नाही.
जल नियोजना बाबतचे त्यांचे विचार/धोरण/निर्णय लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय जलनितिचे खरे जनक आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
अमोल बोर्डे
छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र