मानवाच्या अधोगतीची कारणे:

मानवाच्या अधोगतीची कारणे:

      तथागत बुद्ध एके समयी श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात राहात होते. जेव्हा रात्र संपत आली असता एक देवता सत्पुरुष जेतवनात तथागत होते तेथे आला व तथागत बुद्धाला वंदन करून एका बाजूला उभा राहिला आणि तथागत बुद्धाला मानवाच्या पराभवाची कारणे कोणती हे सांगण्याची विनंती केली, तेव्हा तथागत बुद्धाने मानवाच्या पराभवाची बारा कारणे सांगितली ती खालीलप्रमाणे आहेत.

१. तथागत बुद्ध म्हणाले, ज्याची उन्नती होते अशा पुरुषाची ओळख सहज होते. उन्नती करणारा पुरुष हा धम्माचे आचरण करणारा असतो आणि ज्याची अवनती होते तो धम्माचा द्वेष करणारा असतो, त्यामुळे त्याची अधोगती होते कारण त्याचे आचरण शुद्ध नसते. तो कायेने, वाचेने आणि मनाने पापकर्म करीत असतो हे त्याच्या अधोगतीचे कारण आहे.
२. ज्या माणसाला सज्जनाची संगत आवडत नाही, जो नेहमी दुर्जनाच्या संगतीत राहतो. खूनी, व्यभिचारी माणसं नेहमी वाईट कर्मे करीत असतात. त्यामुळे त्यांच्या संगतीत राहणारा माणूस त्यांच्या प्रमाणेच वाईट कर्मे करतो, त्यामुळे त्याची अधोगती होते. संत कबीर म्हणतात,
 *संगत करे बड़े की तो बढत बढत बढजाय ।*
 *संगत करे गधे की फिर फिर गोता खाय ।।*
      यासाठी नेहमी सज्जनाची संगत करावी, नाहीतर अधोगती ठरलेली आहे हे समजावे.
३. जी व्यक्ती सतत झोपून राहते, कष्ट करीत नाही. जी व्यक्ती आळशी आहे, आणि क्रोधी आहे. अशा माणसाची अधोगती होते. आळशी आणि क्रोधी माणसे कधीही सुखी होत नाहीत, त्यांची अधोगती होते. त्यांचे धन घटत राहते.
४. चौथे अधोगतीचे कारण, जो समर्थ असून वृद्ध आई-वडिलांची सेवा करीत नाही, त्यांचे पालन पोषण करीत नाही अशा माणसाची अधोगती होते. आई-वडील ही आमची पूर्व दिशा आहे.
५. पांचवे कारण- जो ब्राह्मणाला, श्रमणाला किंवा इतर गरीबांना खोटे बोलून फसवतो कारण खोटे बोलणे हे वाचेचे पाप आहे. एक खोटे लपविण्यासाठी त्याला दुस-यांदा खोटे बोलावे लागते अशाप्रकारे पुन्हा पुन्हा खोटे बोलतो आणि वाचेने पाप कर्म करतो. त्याचेवर कोणी विश्वास ठेवत नाहीत, त्याला मदत करीत नाहीत. त्यामुळे त्याची अधोगती होते.

६. सहावे पराभवाचे कारण- ज्या माणसाकडे भरपूर धनदौलत आहे, अन्नधान्ये आहे, तो श्रीमंत आहे, परंतु कोणालाही मदत करीत नाही. ब्राह्मण, श्रमण, गरीब जो अन्नावाचून उपाशी मरत आहे. मात्र या अन्नधान्याने संपन्न असणा-या माणसाला दया, माया येत नाही अशा माणसाची अधोगती होते. कारण त्याच्याबद्दल कोणाला आदर वाटत नाही. त्याच्याबद्दल सर्वांच्या मनात चीड येत असते. संकट समयी त्याला कोणी मदत करीत नाहीत म्हणून तो लुटला जातो, संकटात सापडतो म्हणून त्याची अधोगती होते.
७. सातवे पराभवाचे कारण- ज्या माणसाला जातीचा, धनाचा, गोत्राचा गर्व आहे, जो दुस-याचा आदर करीत नाही, अपमान करतो अशाची अधोगती होते. त्याचा पराभव होतो. म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारचा गर्व ठेवू नये.
८. आठवे पराभवाचे कारण- जो मनुष्य व्यभिचारी आहे, व्यसनी आहे. असा मनुष्य हा नेहमी अशा व्यसनामुळे संपत्तीचा नाश करतो. त्यामुळे त्याचा पराभव अटळ असतो. त्याची अधोगती होते. दारु, जुगार, व्यभिचार ही अधोगतीची कारणे आहेत. म्हणून प्रत्येक माणसाने व्यसनापासून दूर रहावे.
९. नववे पराभवाचे अधोगतीचे कारण- जो मनुष्य पत्नीपासून संतुष्ट राहत नाही. परस्त्री-गमन वेश्येशी संबंध ठेवतो, अशा माणसाची अधोगती होते. त्यामुळे त्याची निंदा होते. त्याला वेगवेगळे आजार जडतात. धन संपत्तीचा नाश होतो आणि वाईट स्थितीत त्याचा अंत होतो. हे त्याच्या पराभवाचे अधोगतीचे कारण आहे.
१०. दहावे पराभवाचे कारण म्हणजे जो वयस्कर आहे, परंतु तरुण मुलीबरोबर लग्न करतो. तिच्या इच्छेप्रमाणे राहत नाही. तिच्या चिंतेने जळत राहतो, तिच्याकडे संशयाने पाहतो, मारझोड करतो, घरात कलह वाढतो आणि त्याची अधोगती होते. त्याचा संसार रसातळाला जातो, त्याचा पराभव होतो. या साठी तथागत बुद्धाने सांगितले, 'सदाचारी राहा, शीलवान व्हा त्यामुळे आपली अधोगती होणार नाही. म्हणून आपल्या वयाला शोभेल अशा स्त्रीशी विवाह करावा.
११. अकराव्या पराभवाचे कारण- जो मनुष्य लोभी आहे, उधळ्या आहे. अशा स्त्री किंवा पुरुषाला अधिका-याच्या जागेवर बसवले, तर अशा माणसांचा पराभव व अधोगती होते. कारण तो काटकसरी नसतो. त्यामुळे नेहमी त्याची अधोगती होते. नाश होतो. पराभव होतो म्हणून पत्नी-पती, मुलगा-मुलगी, सर्वजण धनाची जाणीव ठेवणारे असले पाहिजेत. धन जपणारा असला तरच तो सुखी होतो आणि त्याची अधोगती होत नाही. त्याचा संसार सुखाचा होतो.
१२. बारावे पराभवाचे आणि  अधोगतीचे कारण आहे, एखादा मनुष्य क्षत्रिय आहे त्याला आपल्या कुळाचा गर्व आहे. अशा माणसांचा पराभव होतो. कारण क्षत्रिय आहे, परंतु मनुष्य बळ नाही, धन नाही, कुळाच्या गर्वात राहतो, त्यामुळे त्याचा पराभव होतो. त्याची अधोगती होते. जातीच्या कुळाच्या नावावर कोणीही सुखी होत नाही. त्यासाठी मेहनत प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच सुख प्राप्त होते.
      या वरील बारा कारणाने तो सुखी होत नाही, तर तो नेहमी मानसिक दडपणाखाली जगतो, त्याचे मन शांत नसते त्यामुळे तो दुःखी होतो. ही आहेत मानवाच्या अधोगतीची कारणे.
              (संदर्भ: पराभव सुत्त - सुत्तनिपात)
                           भवतु सब्ब मंगलं !
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel