नोकरी करणाऱ्या या वर्गातील महिलांसाठी वसतिगृह योजना
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी वसतिगृह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश शहरांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि परवडणारी निवास व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे.
अनेक महिलांना शिक्षण किंवा नोकरीसाठी आपल्या गावातून मोठ्या शहरात जावे लागते. अशा वेळी राहण्याची योग्य आणि सुरक्षित व्यवस्था नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे.
तर आता या वर्गातील नोकरी करणाऱ्या महिलांना मोफत राहण्यासाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. या वसतिगृहांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या दैनंदिन गरजांचा विचार करून विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वसतिगृहामध्ये सुरक्षित निवास, कॉट, अंथरूण-पांघरूण, वैद्यकीय सुविधा, नातेवाईकांसाठी स्वतंत्र कक्ष, वाहन पार्किंग तसेच ग्रंथालय व इनडोअर खेळ साहित्य यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे महिलांना सुरक्षित वातावरणात राहून नोकरी करणे अधिक सोपे होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी अनुसूचित जाती/जमाती, विमुक्त व भटक्या जाती, इतर मागास प्रवर्ग किंवा अनाथ घटकातील महिला पात्र आहेत.
अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच नोकरीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. याशिवाय संबंधित महानगरपालिका क्षेत्रामध्ये अर्जदार महिलेचे जवळचे नातेवाईक नसावेत. तसेच अर्जदाराचे मासिक उत्पन्न रु. ३०,०००/- पेक्षा जास्त नसावे अशी अट देखील लागू आहे.
या योजनेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. तसेच अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा.
👉 संकेतस्थळ : https://sjsa.maharashtra.gov.in/�
📷 @mahasjsa
✉️ @SJSAMaharashtra-mahasjsa
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन

Leave Comments
Post a Comment