डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महिलांच्या अधिकारांची लढाई

भारतीय समाजात स्त्रीला समान माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा, तिच्या कर्तृत्वाला कायद्याचे संरक्षण मिळावे आणि तिचे जीवन केवळ कुटुंबाच्या चौकटीपुरते मर्यादित राहू नये, यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य अत्यंत #दूरदर्शी होते. महिलांची मुक्ती ही समाजाच्या प्रगतीची कसोटी आहे, या व्यापक विचारातून त्यांच्या सामाजिक आणि घटनात्मक कार्याकडे पाहावे लागते.



भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्त्री-पुरुष समानतेला केवळ सामाजिक आदर्श न ठेवता #कायद्याचे_संरक्षण असलेला अधिकार बनवले. संविधानातील कलम १४ समानतेची हमी देते; कलम १५ लिंगाच्या आधारावर भेदभावास मनाई करते आणि कलम १५(३) महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार राज्याला देते. कलम १६ सार्वजनिक रोजगारात समान संधीची हमी देते. तसेच राज्याच्या धोरणनिर्देशक तत्त्वांतील कलम ३९(अ) पुरुष आणि महिलांना उपजीविकेच्या साधनांचा समान अधिकार आणि कलम ३९(ड) समान कामासाठी समान वेतनाची दिशा देते.    


  मात्र बाबासाहेबांचे महिलांसाठीचे योगदान केवळ संविधानातील समानतेपुरते मर्यादित नव्हते. #हिंदू_कोड_बिलासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा त्यांच्या स्त्री-मुक्तीच्या विचारांचा सर्वात ठळक पुरावा आहे. #विवाह, #घटस्फोट, #दत्तक, #वारसा आणि #मालमत्ता यांसारख्या विषयांमध्ये महिलांना अधिक न्याय्य अधिकार मिळावेत, यासाठी त्यांनी कायद्यात मूलभूत बदल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मते समाजाची पुनर्रचना करायची असेल तर महिलांना पुरुषांच्या बरोबरीचा सामाजिक दर्जा मिळणे अपरिहार्य होते.    


  या विधेयकाला झालेल्या तीव्र विरोधामुळे बाबासाहेब अत्यंत अस्वस्थ झाले. हिंदू कोड बिलाच्या प्रश्नावर सरकारशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी १९५१ मध्ये केंद्रीय कायदेमंत्रिपदाचा #राजीनामा दिला. आज मुलीला वडिलोपार्जित संयुक्त कुटुंबाच्या मालमत्तेत मुलाप्रमाणे समान हक्क मिळतो, हे आपल्याला स्वाभाविक वाटते. परंतु या अधिकारामागे दीर्घ सामाजिक आणि कायदेशीर #संघर्ष आहे. २००५ च्या हिंदू वारसा कायद्यातील दुरुस्तीने मुलीला जन्मतःच मुलाप्रमाणे सहहिस्सेदाराचा दर्जा आणि समान हक्क दिला.    


  म्हणून बाबासाहेबांनी महिलांना दिलेला सर्वात मोठा अधिकार कोणता, असा प्रश्न विचारला तर उत्तर केवळ “मालमत्तेचा हक्क” किंवा “समानतेचा अधिकार” एवढेच नसावे. त्यांनी स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती, समान नागरिक आणि #स्वतःच्या_अधिकारांची_मालक म्हणून पाहण्याची आधुनिक दृष्टी दिली.    


  बाबासाहेबांचा स्त्री-मुक्तीचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. कारण स्त्रीला शिक्षण, संपत्ती, रोजगार, समानता आणि निर्णयस्वातंत्र्य मिळाले, तर बदल केवळ एका स्त्रीच्या आयुष्यात होत नाही - संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि पुढच्या पिढीची दिशा बदलते. म्हणूनच महिलांच्या अधिकारांच्या इतिहासात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे केवळ एका कायदेमंत्र्याचे कार्य नसून भारतीय स्त्रीला समान नागरिकत्वाच्या पायावर उभे करणाऱ्या एका महान #सामाजिक_क्रांतिकारकाचे कार्य आहे.


लेखन - सूरज तळवटकर

विरार, पालघर

Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel

WhatsApp
🌐 भाषा: