🇮🇳📓 भारतीय राज्यघटनेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान:- शिवश्री नामदेवराव जाधव ⚔👑

🇮🇳📓 भारतीय राज्यघटनेतील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान:- शिवश्री नामदेवराव जाधव ⚔👑

जागतिक कीर्तीचे प्रभावशाली वक्ता आणि सुप्रसिद्ध इतिहास संशोधक शिवश्री नामदेवराव जाधव सरांनी वरील विषयासंदर्भात जे विचार मांडले आहेत त्यातील काही भाग या ठिकाणी वाचकांसाठी लिखित स्वरुपात देत आहे. सरांचे संपूर्ण विचार ऐकण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

https://youtu.be/Ayp-GgjVofw

      भारताच्या संविधानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही अलौकिक (?) असं महत्व दिलेलं आहे, त्याच्याबद्दल मी आज आपल्यासमोर भूमिका मांडणार आहे. (शिवश्री नामदेवराव जाधव सर) 👇

घटनेमध्ये जी काही प्रकरणे आहेत त्या प्रकरणामधील एक प्रमुख प्रकरण आहे इलेक्शन, म्हणजे #निवडणुका! संघराज्यातील लोकशाहीचा आत्मा (?) अशा नावाचं ते प्रकरण आहे. आणि विशेष म्हणजे या प्रकरणाच्या सुरूवातीलाच जो फोटो आहे, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे आणि शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लाल किल्ला दाखविलेला आहे. म्हणजे डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणायचं असेल किंवा अभिप्रेत असेल कि, या देशाचं दिल्लीतील चालणारं सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चाललं पाहिजे.(?) शिवाजी महाराजांनी ज्याप्रकारे राजेशाही असताना लोकशाही निर्माण केली (?) आणि लोकांच्या कल्याणासाठीच राज्य निर्माण करण्याचा जो एक मानदंड घालून दिला. त्यालाच एक प्रकारचं अभिवादन, किंवा त्यालाच एक प्रकारचा मुजरा करीत असताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत जाणीवपूर्वक निवडणुका नावाचे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला आहे.(?) जर आपण कोणीही भारताची ओरिजनल राज्यघटना बघितली नसेल तर आपल्यासारखे दुर्देवी आपणच असू शकतो. मी त्यातला एक भाग्यवान माणूस आहे कि, ज्यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हस्ताक्षरात (?) लिहिलेले संविधान ते बघण्याची मला संधी मिळाली. डाॅ.बाबासाहेबांचे भारतीय राज्यघटनेत अत्यंत सुरेख Handwriting आपल्याला पाहायला मिळते.(?) छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात राज्य स्थापन करण्याची घोषणा केली होती. आणि म्हणून कदाचित शिवाजी महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली याचा आदर्श ठेवून (?) किंवा यालाच केंद्रस्थानी ठेवून जेव्हा जेव्हा भारतामध्ये निवडणुका होतील तेव्हा त्यावेळी निवडणुका कशा असाव्यात, त्यातून लोकप्रतिनिधी कसे निवडले जावेत, आणि त्यांनी या देशाचा कारभार सामान्य माणसावरती फोकस करुन, सामान्य माणूस हाच केंद्रबिंदू समजून जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत याच्या वर जाऊन माणूस म्हणून जो काही विकास करायला पाहिजे याचा एक आदर्श म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे वयाच्या पंधराव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली तसचं डाॅ.बाबासाहेबांनी सुध्दा भारताच्या राज्यघटनेमध्ये पंधरा नंबरचे प्रकरण आहे इलेक्शन, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा अत्यंत आदरपूर्वक असा तो फोटो लावलेला आहे.(?) लोकशाही टिकविण्यासाठी अशाच प्रकारची आम्हांला हत्यारे चालवावी लागतील.(?) आणि लोकशाहीचे प्रसंगी रक्षण करावे लागेल. लोकशाहीच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत विकासाची गंगा पोहचविणे अाणि याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन सगळ्यात आदर्श आणि उत्तम आहे हे सुध्दा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही स्थान दिलेले आहे, याच्यावरुन स्पष्ट होते.(?) शिवाजी महाराजांना जे रयतेचे राज्य अपेक्षित होते तशाच प्रकारचं स्वतंत्र भारतामध्ये रयतेचे राज्य उभं राहावं ही डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती.(?) आणि म्हणून भारतामध्ये लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे राज्य उभे करायचे असेल तर शिवचरित्र व्यवस्थित समजून घेऊया.
#समाप्त

     ज्या ज्या ठिकाणी मी प्रश्नार्थक चिन्ह दिले आहे, त्याबद्दल सुज्ञ वाचकांनी अधिक माहिती मिळवण्याचा जरुर प्रयत्न करावा. काही प्रश्नांची उत्तरे मी या लेखाच्या माध्यमातून देणारच आहे.

     सर्वप्रथम आपण खालील विषयावर बाबासाहेब शूद्र पूर्वी कोण होते? या ग्रंथाच्या प्रस्तावनेत काय म्हणतात ते पाहूया.

💥 इतिहासकार कसा असावा?

इतिहासकार हा काटेकोर, तळमळीचा आणि पंक्तीप्रपंच न करणारा असा असला पाहिजे; तो भावनाविरहित, आपुलकीची भावना, भीती, तिरस्कार आणि प्रेमाची ओढ यांच्यापासून मुक्त असा असला पाहिजे; आणि इतिहासाची जननी जी #सत्यनिष्ठा ती त्याच्या रोमारोमांत भिनलेली असली पाहिजे; महत्कृत्यांना सुरक्षित ठेवणारा, अंधाराचा संहार करणारा, पूर्व काळाचा साक्षी आणि भावी काळाचा नेता असला असा तो असला पाहिजे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे अगदी रिकामे नसणारे नव्हे, पण उघडे असणारे असे त्याचे मन पाहिजे आणि खोटेनाटे पुरावे जरी त्याच्या हाती लागले तरी त्या सर्व #पुराव्यांची_छाननी करण्याची त्याची तयारी पाहिजे. इतिहासकारांनी हे कडक ब्रीद पाळणे आवश्यक आहे.
     सर, तुमच्याविषयी माझ्या मनात #आदरभाव निश्चितच आहे, त्याबद्दल शंका नसावी. परंतु असे असले तरीही, तुम्ही या Video च्या माध्यमातून जे विचार मांडले आहेत ते चुकीचे कसे आहेत, हे आपल्या निदर्शनास आणून देणे मला महत्वाचे वाटले यासाठीच हा सारा प्रपंच! सर, आपण सर्वप्रथम डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांविषयी मांडलेली भूमिका नीट समजून घेण्यासाठी 'शूद्र पूर्वी कोण होते?' हा मौलिक ग्रंथ वाचण्याची नितांत गरज आहे.

💥 आता मूळ विषयाकडे वळूया....

      १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध देशातील घटनांचा सतत सखोल अभ्यास करुन तयार केलेली स्वतंत्र भारताची राज्यघटना तत्कालीन राष्ट्रपती डाॅ.राजेंद्र प्रसाद यांना २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी सादर केली. राष्ट्रपतींनी त्या दिवशी संविधान स्वीकृत करुन त्यावर हस्ताक्षर केले. २६ जानेवारी, १९५० पासून भारत हे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य म्हणून उदयास आले. २६ जानेवारी १९५० रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध काळातील गणराज्यांचे दुसऱ्यांदा पुनरुत्थान केले आणि बुध्दकालीन गणराज्यांची बरीच तत्वे भारतीय संविधानाने स्वीकारली. तेव्हापासून बुध्द तत्वज्ञानावर आधारित शासन व्यवस्था या देशाला मान्य करावी लागली.
 

  दिनांक ४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे तिसऱ्या जागतिक बौद्ध धम्माच्या अधिवेशनात बाबासाहेबांनी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धम्माच्या पुनरुत्थानाविषयी भारतीय राज्यघटनेत ज्या काही गोष्टी करून टाकल्या त्याविषयी ते सांगतात, त्या गोष्टी पुढीलप्रमाणे आहेत. #मी_भारताची_घटना_तयार_केली. तीत पाली भाषेच्या उत्थानाची योजना करून ठेवली आहे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रध्यक्षाच्या राजवाड्यावर गौतम बुद्धाच्या शिकवणुकीतील पहिलेच चरण धम्मचक्र परिवर्तन घातले. तिसरी गोष्ट म्हणजे भारतीय पार्लमेंटच्या निशाणावर अशोकचक्र हे भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे. हे सर्व करताना मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन व पार्लमेंटच्या इतर सभासदांचा विशेष विरोध झाला नाही. इतके स्पष्ट नि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते.
     भारतीय संविधान निर्मितीमध्ये तथागत बुध्दांच्या तत्वज्ञानाचे सार आहे. भारतीय संविधानाच्या उद्देशिकामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, गणराज्य ही मूल्ये बाबासाहेबांनी बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतली आहेत. भारत या राष्ट्राच्या निर्मितीची संकल्पना करताना भारतीय संविधान निर्मात्यांनी जी #प्रतीके, #राष्ट्रचिन्हे आणि #मूल्यधारा अधिष्ठित केली आहे, ती बौद्ध धम्माशी निगडीत आहेत. मी या ठिकाणी २५ नोव्हेंबर, १९४९ च्या बाबासाहेबाच्या भाषणाचा संदर्भ देत आहे. भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहित नव्हते असे नाही. एक काळ असा होता कि, भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे #राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा #सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असे नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते कि, त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे, संघ हे दुसरे काही नसून संसदच होते, तर अाधुनिक काळाला परिचित असलेल्या संसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहित होते आणि त्यांचे ते पालन करीत होते. बसण्याच्या व्यवस्था, विधेयक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, पक्ष प्रतोदाने आदेश काढणे, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था इत्यादीबाबत त्यांच्याजवळ नियम होते. संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले, तरी देशात त्याकाळी कार्यरत असलेल्या राजकीय विधिमंडळांच्या नियमावलीतूनच त्यांनी ते स्वीकारले असले पाहिजे.

     सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय अशा सर्व तत्वांनी युक्त अशी एक मोठी संसदीय लोकशाहीची जी परंपरा आहे, ती बौद्ध युगाची आहे. लोकशाहीची मूल्ये आणि बुध्द धम्माची सांस्कृतिक मूल्ये यांच्या समन्वयातूनच लोकशाहीला बळकटी प्राप्त होऊन समाजाच्या पुनर्रचनेसह देशाचा विकास साधला जाऊ शकतो. तथागत गौतम बुध्दांनी वैशाली गणराज्याच्या वज्जींना केलेले लोकशाहीप्रधान गणतंत्र राज्यकारभारासंबंधीचे स्पष्टीकरण ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे आहे. इतकेच नव्हे, तर बुध्दकालीन राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण, ऐक्य व अंखडत्व याबाबत गणराज्याच्या भवितव्यासाठी वैशालीच्या वज्जींना तथागत बुध्दांनी केलेला उपदेश आजही राष्ट्रीय उन्नतीची तत्वे म्हणून स्वतंत्र भारताचे ऐक्य व अखंडत्व राखण्यात उपयुक्त आहे. घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आणि बुध्द धम्म यांना एकाच विचारधारेच्या अंतर्गत आणले आहे, या #सत्याचे_आकलन इतिहास संशोधकानी करून घेणे गरजेचे आहे.
     नवी दिल्लीच्या आकाशवाणी केंद्रावरून डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे दि.३ आॅक्टोबर, १९५४ रोजी भाषण प्रसारित करण्यात आले होते. "माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान" असा त्या भाषणाचा विषय होता. आपल्या जीवनाच्या तत्वज्ञानाविषयी सांगताना ते म्हणतात, "माझे जीवनविषयक तत्वज्ञान तीन शब्दातच समूर्त झालेले आहे. #स्वातंत्र्य, #समता आणि #बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरुन माझे जीवनविषयक तत्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धम्मात आहे. माझे गुरु भगवान बुध्द यांच्या शिकवणीतूनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे." आतापर्यंत तत्वज्ञानाचा विषय पूर्णपणे स्पष्ट झालेला आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

💥आता दुसऱ्या विषयाकडे वळूया....

     २६ जानेवारी १९५० पासून भारतात संविधान लागू करण्यात आले. आपले मूळ संविधान हे छापील दस्तऐवज नव्हते. #आचार्य_नंदलाल_बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण #हस्तकला पूर्ण केली होती, तसेच दिल्लीतील #प्रेमबिहारी_नारायण_रायजादा यांनी त्यांच्या #सुवाच्च_अक्षरात ही घटना लिहिली. मूळ घटनेच्या प्रत्येक पानावर डाव्या बाजूला अगदी खालच्या भागात PREM असं नाव लिहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तसेच बावीस प्रकरणांमध्ये काढलेल्या वेगवेगळ्या चित्रांच्या ठिकाणी देखील त्या त्या कलाकराचे नाव त्याठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सर, खातरजमा करावयाची असल्यास तुम्ही मूळ घटना पुन्हा बारकाईने पाहाल अशी आशा बाळगतो. त्यामुळे आपण वर जे वक्तव्य केलेत ते साफ खोटे आहे, हे स्पष्ट होते.
     प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी भारतीय संविधान मूळ हस्तलिखित दस्तऐवजाची सुरेख रचना सुलेख धारण करणारा निब वापरुन उत्कृष्ट रचना केली आणि तो पूर्णपणे अमंलात आणला. या कामासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले नाही. शांतिनिकेतनमध्ये, नंदलाल बोस यांनी आपल्या काही विद्यार्थ्यांसह कलांचे (चित्रांचे) काम पूर्ण केले. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानातील निवडणुका या पंधराव्या प्रकरणात शिवाजी महाराजांचे चित्र व त्यामागे लाल किल्ला दाखविलेला असे तुम्ही जे विधान केले आहे ते देखील कसोटीवर खरे ठरत नाही. संविधानाची उद्देशिका हे पृष्ठ बीहर राममोहनर सिन्हा यांनी केले होते. आर्टवर्कशी संबंधित आणखी एक कलाभवनातील कलावंत म्हणजे कृपाल सिंह शेखावत, ते राजस्थानचे होते.
   


मूळ संविधानाच्या एकूण बावीस प्रकरणातील प्रत्येक भागाच्या सुरुवातीला नंदलाल बोस यांनी भारताच्या राष्ट्रीय अनुभव आणि इतिहासातून एक पायरी किंवा देखावा दर्शविला आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी नंदलाल बोस यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा सूचना केल्याचे आढळत नाही. भारतीय उपखंडाच्या इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडातील रेखाचित्र दर्शविणारी चित्रकला आणि स्पष्टीकरण, सिंधु घाटातील मोहेंजोदडो, वैदिक कालावधी, गुप्त व मौर्य साम्राज्य आणि मुघल राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे युग असे वेगवेगळे चित्रण बावीस प्रकरणांच्या सुरुवातीच्या पृष्ठावर केलेले आहे. नंदलाल बोस यांनी भारताचा समृध्द इतिहास, परंपरा व ४००० वर्षांच्या संस्कृतीचा काळ चित्रांच्या माध्यमातून आपल्यापुढे (भारतीयांपुढे) मांडला आहे



      काही प्रकरणांच्या सुरुवातीला असलेले चित्र वैदिककालीन काळ गुरुकुल (वन आश्रमशाळा विद्यालय) आणि रामायण आणि महाभारतमधील प्रतिमा महाकाव्य कालावधी दर्शवितात. रामायण आणि महाभारतातील पात्रांविषयीचे भीमरावाचे तरुण वयातील विचार कशाप्रकारचे होते हे तुम्हांला जाणून घ्यावयाचे असतील तर बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथराजाची प्रस्तावना एकदा वाचावी. मग आपण विचार करा, १९५० पर्यंत ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचलेले, ज्ञानाचा महामेरू,जागतिक पातळीवरील विद्वान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे रामायण आणि महाभारतातील त्या चित्राच्या माध्यमातून कोणता आदर्श भारतीय जनतेला देऊ इच्छित आहेत? याचे आपण अधिक स्पष्टीकरण दिल्यास उत्तम होईल.
      मूळ भारतीय राज्यघटनेतील बावीस प्रकरणांपैकी काही ठिकाणी तथागत गौतम बुध्द आणि महावीर यांचे जीवन तसेच अशोक आणि विक्रमादित्य यांच्या न्यायालयांमधील दृष्य रेखाटलेले आहे. एका ठिकाणी चोल कांस्य परंपरेतून नटराजाचे एक सुंदर रेखाचित्र रेखाटलेले आहे. भारताच्या इतिहासातील इतर महत्वाच्या व्यक्तींपैकी अकबर, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंह, टीपू सुलतान, आणि लक्ष्मीबाई, मि.गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यादेखील चित्रांचा समावेश आहे. मग बाबासाहेबांनी या सर्वांकडूनच कोणता न् कोणता आदर्श घेतला असावा, असे तुम्हांला सुचवायचे आहे का? याविषयीचे तुमचे उत्तर जर 'हो' असे असेल तर तुम्ही खूप मोठी गफलत करीत आहात. कारण, बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात #बुध्द, #कबीर आणि #फुले यांनाच आपले #आदर्श मानले आहे. याव्यतिरिक्त इतर कोणालाही त्यांनी आपले आदर्श मानलेले नाही. (२८ आॅक्टोबर, १९५४, मुंबई) डाॅ.बाबासाहेब म्हणतात माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुध्द होत. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मांडलेले मत देखील पूर्णपणे चुकीचे असल्याचे सिद्ध  होते. तुम्ही मूळ राज्यघटनेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचा आधार घेऊन जो काही #खोटा आणि #खोडसाळ_प्रचार करीत आहात तो कृपया थांबवावा. त्या चित्राच्या आधारावर तुम्ही जे काही निष्कर्ष काढलेले आहेत, ते पूर्णपणे फोल ठरतात यात शंकाच नाही. तुम्ही अशाप्रकारचे विचार मांडून लोकांची #दिशाभूल, #फसवणूक करीत आहात.

💥 वाचकांसाठी एक सूचना:-

     प्रा.नामदेवराव जाधव सरांनी त्यांच्या शिवाजी महाराज & एम.बी.ए या पुस्तकात वरील विषयासंबंधी लिखाण केलेले आहे. कृपया वाचकांनी त्यांच्या खोट्या अपप्रचाराला बळी पडू नये. आपल्या चिकित्सक बुध्दीने विचार करूनच कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करावा.
     डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी जोपर्यंत जागरुक आहेत तोपर्यंत अशा प्रकारचा खोडसाळपणा करणाऱ्यांचे #मनसुबे कदापि पूर्ण होणार नाहीत. तुम्ही काढलेल्या निष्कर्षांशी कोणताही सुज्ञ व्यक्ती सहमत होईल असे मला अजिबात वाटत नाही. वरील विषयाचे स्पष्टीकरण देताना आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत, त्या मी आपल्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. भारतीय संविधानात बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या तत्वज्ञानाचा समावेश केला आहे? किंवा त्यांच्याकडून कोणता आदर्श घेतला? हे जर तुम्ही भक्कम पुराव्यानिशी सिध्द करुन दाखविले तर मी माझे विचार मागे घ्यायला तयार आहे. माझी ही पोस्ट तुमच्यापर्यंत लवकरच पोहचेल अशी मला खात्री आहे. मी तुमच्या उत्तराची वाट पाहतोय......!

#लेखन,
S.P.Talvatkar®✍
#क्रांतीभूमी
Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel