शेवगाव तालुक्यातील ४८ ग्रामपंचायती वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार :- प्रा. किसन चव्हाण.

 


शेवगाव (प्रतिनिधी) :- आपले प्रश्न आपणच सोडविले पाहिजेत, त्यासाठी आपल्या हातात सत्ता असणे गरजेचे आहे म्हणूनच आगामी काळात वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका स्व बळावर लढविणार अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशमहासचिव प्रा. किसन चव्हाण यांनी केली. 


शेवगाव येथील ममता लॉन्स मध्ये आयोजित शेवगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. शेवगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश बापु भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वंचित चे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल भाई शेख, माजी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब मगर, शेवगाव नगर परिषदेच्या सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष रमेश खरात, सलीम भाई शेख, विशाल इंगळे, कैलास चोरमले, विठ्ठल मगर, सागर गरुड।यांच्यासह शेवगाव तालुक्यातील ४५ गावांचे प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. 



शेवगाव तालुक्यातील विविध गावांतील प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नावर या बैठकीत चर्चा करून ते कसे सोडविता येतील याबद्दल विचार विनिमय करण्यात आला. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही गावातील रस्ते, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, गटार योजना, घरकुल योजना, स्मशानभूमी, रेशनकार्ड, जागेचे उतारे, जातीचे दाखले मिळत नाहीत, अशा समस्या विविध गावांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत मांडल्या. यामध्ये बहुतांश प्रश्न दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी, या घटकांचे आहेत. गाव पातळीवरचे प्रश सोडविण्यासाठी सामूहिकपणे एकत्र येऊन ग्रामसेवक, तलाठी, सरपंच यांना भेटून त्याबाबत जाब विचारला पाहिजे. ग्राम पातळीवर जे प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येऊन तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली पाहिजे असे ते म्हणाले.


सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित पुढाऱ्यांना वंचितांच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे. नसते त्यामुळे आपली लढाई आपणच लढली पाहिजे त्यासाठी गावातील अठरा पगडा जातीतील कार्यकर्त्यांनी सतत सजग राहीले पाहिजे आणि जागृतीचा विस्तव कायम तेवत ठेवला पाहिजे असे ते म्हणाले. 

यावेळी गावातील शिवरस्ते, स्मशानभूमीची दुर्दशा, रेशनकार्ड या प्रश्नांकडे शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे व तालुका पुरवठा अधिकारी पवन विधोत यांच्याशी प्रा. किसन चव्हाण यांनी चर्चा केली. यावेळी सुरेश फुलमाळी, महेश शिरसाठ, राणी वाघ, रामदास खरात, भाऊराव ससाणे, रावसाहेब काटे, रेश्मा गायकवाड, रमेश बोरुडे, भगवान मिसाळ आदींनी आपापल्या गावातील समस्या मांडल्या. 

प्यारेलाल भाई शेख यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश बापू भोसले यांनी सूत्रसंचालन केले. आप्पासाहेब मगर यांनी आभार मानले. 


फोटो ओळी :- शेवगाव येथील ममता लॉन्स येथे आयोजित शेवगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलतांना प्रा. किसन चव्हाण समवेत बापूसाहेब भोसले, प्यारेलाल भाई शेख व उपस्थित कार्यकर्ते (छाया :- ऋषिकेश राऊत)

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel