धर्म, भेदभाव, आणि अंधश्रद्धेच्या पलीकडे जाणारा शिक्षक असावा...
सर्व शिक्षक हे आदरणीयच..पण शिक्षकांस सर्व विद्यार्थी समान असतात का?वास्तवतःशिक्षक हा हुशार—ढ विद्यार्थी ह्यातच अडकलेला असतो.हे कितपत योग्य आहे? सर्वांमधे काही ना काही कला ही असते. पण शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मार्कांवर ते हुशार की ढ विद्यार्थी हे शिक्षकच ठरवत असतात अन् इथुनच विद्यार्थ्यांच्या डोक्याची मशागत चालु होते ती ते कशात मोडतात.कळत नकळत तुलनेचा मार्ग शिकवला जातो.त्यानंतर प्रवास चालु होतो तो अंधश्रध्देचा.दरवर्षी साजरी होणारी सरस्वती पुजा.तीच विद्येची देवता हेच डोक्यात टाकल्या जातं अगदी बालवाडीपासुन.पण ज्या साविञी आईनी शेणा—मातीचा मारा सोसुन शिक्षणाची बीजं रोवली त्या साविञी आईची ओळख करुन दिली जात नाही.ज्या महापुरुषांनी सामाजिक बदल घडवला ते फक्त पुस्तकातील एखाद्या धड्यापुरतेच मर्यादित ठेवले जातात.त्यांचे विचार डोक्यात टाकले जात नाही ते अंमलात आणले जात नाही.
ह्या वास्तवापेक्षा काल्पनिकतेवरच भर दिला जातो.अन् हे शिक्षकांवरच अवलंबुन असतं त्यांनी कशाला जास्त महत्व द्यावं.पण शिक्षकच उपास—तापास,कर्मकांड करणारे.शाळेतुनच धार्मिक शिक्षणाची सुरवात चालु होते. प्रत्येक सण आले की त्यावर निबंध लिहा किंबहुना बर्याच शाळेत वेशभुषा करण्यास सांगतात.वास्तविक विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टीकोण, चिकीत्सक वृत्ती, तर्कशिलता अन् नितीमत्ता कशी निर्माण होईल हेच शिक्षण देण्याची ओढ शिक्षकांमधे असावी.डोक्यात धर्म टाकण्यासाठी समाज अन् घर काय कमी असतं. पण निदान शाळेत तरी नसावं.शिक्षक अन् विद्यार्थी ह्यांच्या नात्यामधे समता,मैञी तर असावी शिवाय नव नव विचारांना चालना देणारी. विद्यार्थींना इतरांशी स्पर्धा करण्याचं शिक्षण देण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करण्यास शिकवणं जास्त उत्तम.स्वतःशीच स्पर्धा केल्यास दिवसेंदिवस स्वतःचच व्यक्तीमत्व खुलत जातं शिवाय स्वतःची इतरांशी तुलना केली जात नाही.हे प्रगतीच्या दृष्टीनं चांगलच राहील.धर्म,भेदभाव,अंधश्रध्देच्या पलीकडे जाणारा शिक्षक असावा अन् शाळेत हे बदल घडविण्याची ताकद ही शिक्षकांमध्ये असते.
संकलन :- सचिन गरूड
नाशिक जिल्हा

Leave Comments
Post a Comment