आज 15 एप्रिल "बाबासाहेब आणि माईसाहेब यांचा विवाह"


  विवाहासाठी कमलाकांत चित्रे, दौलत जाधव, भाऊराव गायकवाड, डॉ. मालवणकर व दिल्लीतील निवडक मित्र मंडळी यांना लग्नाचे निमंत्रण बाबासाहेबांनी पाठविले होते. जाणीवपूर्वक लग्न विधीला जास्त प्रसिद्धी दिली नाही. नुकतीच झालेली भारत पाकिस्तान फाळणी, 30 जानेवारी 1948 ला झालेला गांधीजींचा खून या पार्श्वभूमीवर देशात वातावरण तंग होते. माईसाहेब दिल्लीला विमानाने गेल्या. चित्रे व जाधव यांनी त्यांना विमानतळावर घेतले. 1 हार्डिंग्ज अव्हेन्यूवर पोचताच चित्र्यांच्या सुनेने पंचारतीने त्यांना ओवाळले आणि भाकरी व पाणी ओवाळून टाकले. बाबासाहेबांकडे बाई माणूस नसल्याने चित्र्यांच्या सुनेला आणले होते. तिने माईसाहेबांना वरच्या माळ्यावर नेऊन वधूचा साजशृंगार करण्यात मदत केली.



         रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेस हे आवश्यक त्या कागदपत्रांसह जातीने हजर होते. नोंदणी पद्धतीने डॉक्टरसाहेबांशी माईंचा विवाह संपन्न झाला. सोहळ्याला 15-20 निवडक निमंत्रित लोक उपस्थित होते. त्यात रजिस्ट्रार ( रंधावा किंवा रामेश्वर दयाल असे त्यांचे नाव होते.) वृत्तपत्राचे वार्ताहर होते. दुपारी जेवणाचा कार्यक्रम व सायंकाळी छोटासा स्वागत समारंभ झाला. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड माऊंट बॅटनचे दूत उपस्थित होते व त्यांनी भेटही पाठविली होती.


         स्वागत समारंभ आटोपल्यावर बाबासाहेब माईंना घेऊन उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भेटीला गेले. त्यांची प्रकृती चांगली न्हवती. आंबेडकर दांपत्यानां पाहताच ते अंथरुनातून उठून बसले. त्यांनी हसून स्वागत केले. माईंना आपल्या शेजारी बसवून पाठीवर हात फिरवून म्हणाले, "बेटी! तुमने डॉ. साहबसे विवाह करके, बडा धैर्य दिखाया है। यह शुभ घटना अगर बापूजी के सामने होती तो और भी ख़ुशी कि बात होती। वो तो फुले ना समाते। मुझे आनंद है और बडी ख़ुशी है। लेकिन इस बात का दुख होता है कि आज बापू हमारे बीच यह क्रांतिकारी घटना देखने के लिये नही है।"


        सरदार पटेलांनी त्यांच्या लग्नप्रित्यर्थ छोटासा समारंभ आयोजित केला होता, परंतु त्यांच्या अनारोग्यामुळे बाबासाहेब अधिक वेळ तेथे थांबले नाही. 


        अनेकांची अभिनंदनाची पत्रे आली. वृत्तपत्रातून बातम्या आल्या, देशविदेशातून अभिनंदनाचा वर्षाव झाला. The Times Of India ने माईंचा उल्लेख चुकीने डॉ. लक्ष्मी कबीर असा केला होता. कारवँ या वृत्तपत्राने 'सारस्वताचा जावई' असे बाबासाहेबांना संबोधिले होते. बाबासाहेबांचे अतूट मित्र नवल भथेना यांचेही अभिनंदन पत्र आले.


माईसाहेबांचे अग्निदिव्य

-प्रा. पी. व्ही. सुखदेवे.


संकलन:- प्रकाश कदम. ( Yogi K )

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel