दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग - 4



रामायणाच्या काही कथांत याचे तुटक संदर्भ मिळतात. जेव्हा राम - रावण युद्धात रावणाची प्रचंड हानी झाली, इंद्रजीत या त्याच्या बलशाली मुलाचा पाडाव झाला, तेव्हा आता मदत कोणाकडे मागायची याचा विचार रावण करू लागला. अहंकारी स्वभावाच्या रावणाने आपल्या पेक्षा कनिष्ठ राजांकडे मदत मागण्याच्या पर्यायाचा विचार न करता असुर कुळातील सर्वात महान सम्राट बळीची मदत मागायचे ठरविले. तसा तो पाताळ नगरीत पोहोचला देखील. बळीच्या महालाच्या द्वारावर उभा असलेल्या वामनाने रावणाला रोखून बळीला भेटण्याचे कारण विचारले. रावणाला विष्णूशी या विषयी बोलायचे नसल्यामुळे त्याने सूक्ष्म रूप धारण करून वामनाला चकवायचा प्रयत्न केला.


मात्र वामनाने रावणाच्या शरीरावर सहज आपला पायाचा अंगठा ठेवून त्याला अक्षरश: जेरीस आणला. पुढे त्यातून सुटका झाल्यावर रावण बळीसमोर आला. त्यावेळी बळी आपल्या दरबारात एकटाच बसून काही विचार करीत होता. रावणाला अचानक कोणत्याही वर्दी शिवाय आत आल्याचे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वामनाने तुला आत कसे सोडले, असे बळीने रावणाला विचारले. त्यावर रावणाने फुशारकी मारून मला कोणीही अडवू शकत नाही, असे म्हटल्यावर बळीने वामन हा प्रत्यक्ष भगवान विष्णू असून, त्याचा कृपेशिवाय तू जिवंत देखील राहू शकणार नाहीस, असे सुनावले. पुढे रावणाने रामाशी सुरू असलेल्या युद्धाची माहिती सांगून बळीकडे मदत मागितली. त्यावर काही वेळ समाधी लावून बळीने युद्धाचे खरे कारण जाणून घेतले व रावणाला सल्ला दिला की त्याने सीतेला तिच्या स्वगृही पाठवल्यास हे युद्धच संपुष्टात येईल. तसेच परस्रीचे हरण करणे असुर कुळाला शोभणारे नसून राम न्याय बुद्धीचा असल्याचे बळीने रावणाला समजावले. मात्र रावणाला ते पटले नाही, तो बळीची मदत न मिळवताच लंकेला परतला.


जर आपण विष्णूच्या अवतारांचा क्रम पाहिला तर प्रथम वामन, मग परशुराम,त्यानंतर राम आणि पुढे कृष्ण असे दिसते. वामन आणि बळी हे राम अवतारापर्यंत अस्तित्वात होतेच. याशिवाय रावणाने मदत मागावी, इतकी सत्ता आणि ताकद त्याकाळी देखील बळीकडे होती. इतकेच नव्हे तर परशुरामाने तब्बल २१ वेळा पृथ्वी नि: क्षत्रिय करताना ज्या अन्यायी आणि दुष्ट राजांचा संहार केला त्यात बळीचा कदापि ही उल्लेख नाही. थोडक्यात बळीच्या अस्तित्वाचे प्रमाण २ स्वतंत्र युगातील पौराणिक कथांत सापडते. त्याच्या न्याय प्रियतेबद्दल, दानशूर आणि पराक्रमी स्वभावा बद्दल कोणतेही प्राण अथवा प्राचीन ग्रंथ अनुद्गार काढत नाहीत. असे का?ब्राम्हणांना जर खरोखरीच बळीला संपवायचे असते, तर त्यांनी त्यांच्या साहित्यातूनच त्याची हकाल पट्टी केली नसती का?


पुढे महाभारतात (वस्तुत: भागवत ग्रंथात) अनिरुद्ध आणि उषेच्या विवाहाचे आख्यान आहे. अनिरुद्ध हा श्री कृष्णाचा रुख्मिणीपासून झालेल्या प्रद्युम्न या मुलाचा पुत्र म्हणजे नातू होता. तर बाणासुर हा बळीच्या १०० पुत्रांपैकी सर्वात मोठा आणि पराक्रमी पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शिवाची कृपा संपादित केली होती. त्यातून त्याला सहस्र बाहू आणि अपार शक्ती प्राप्त झाली होती. भगवान शंकराचा तो जणू मानस पुत्र होता. त्याची कन्या उषेने अनिरुद्धला तिच्या स्वप्नात पाहिले आणि तिने तिच्या चित्रकला या सखी करवी अनिरुद्धला आपल्या शोणितपूर नगरीत (हे नगर आणि मंदिर अद्याप आसामच्या शोणितपूर जिल्ह्यात पाहता येते.) आणवले. पुढे अनिरुद्ध आणि उषा यांनी गंधर्वविवाह करून त्याची वार्ता बाणा सुराला दिली. ज्यामुळे खवळलेल्या बाणासुराने युद्धात अनिरुद्धाचा पराभव करून त्याला नाग्पाशात बद्ध करून ठेवले. ही बातमी नारदा करवी कृष्ण - बलराम आणि इतर यादवांना कळताच त्यांनी शोणितपूर गाठून बाणा सुराला आव्हान दिले. पुढे झालेल्या घनघोर युद्धात बाणा सुराचे अतोनात नुकसान झाले. त्याचे एक सहस्र बाहू देखील कृष्णाने तोडून टाकले, पण त्याचा वध केला नाही. अखेरीस बाणा सुराने कळवळून केलेल्या धाव्यामुळे स्वत: महादेव कृष्णाविरुद्ध युद्धास सज्ज झाले. तेव्हा ब्रह्म देवांनी हस्तक्षेप करून हरिहरांमध्ये होऊ घातलेले युद्ध टाळले. कृष्णाने शंकराला आठवण करून दिली की मी प्रल्हादाच्या वंशातील व बळीच्या पुत्रांस मारणार नाही, असे आश्वासन दिले आहे. तसेच तुम्हीच बाणा सुराला त्याचे गर्वहरण होईल, असा शाप दिला होतात. त्यानुसार मी हे कार्य केले. शंकरांनी सुद्धा हे मान्य करून बाणा सुरास कृष्णाच्या खऱ्या रुपाची कल्पना देऊन त्यांस शरण जाण्यास सांगितले. पुढे बाणा सुराने स्वत: अनिरुद्ध आणि उषेचे थाटामाटात लग्न लावून कृष्णाशी देखील आपला आप्त संबंध दृढ केला.

क्रमशः..

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel