दि मॅनेजमेंट गुरू चक्रवर्ती सम्राट अशोक त्यांची राज्य आणि शेतकरी विषयक धोरण भाग -5


थोडक्यात विष्णू (मग तो देव असो किंवा सृष्टी कल्याण साधणाऱ्या युग पुरुषांचा वंश अथवा उपनाम) आणि असुर यांचे काहीही वाकडे नव्हते. प्रसंगी विष्णू आणि महादेव या दोन प्रमुख दैवतांनी असुरांचे रक्षणच केले आहे. समस्त मानव जातीच्या उद्धारासाठी कदाचित वामनाने देव - बळी यांच्यातील वाद विकोपाला जाण्या पूर्वीच हस्तक्षेप केला असेल. पण कोणत्याही पौराणिक कथा मधून बळीची दुष्ट प्रतिमा रंगवली गेली नाही अगर हे सत्य लपवले गेले नाही. किंबहुना आधुनिक अभ्यासक तर आत्ताचे तिबेट (त्रिविष्टप) हा स्वर्ग असावा, भरतखंड (इराणच्या पूर्वेपासून ते आत्ताच्या इंडोनेशिया पर्यंत प्राचीन अखंड भारत) हे पृथ्वी आणि आत्ताचे दक्षिण अमेरिका हे पाताळ असावे, असा सिद्धांत मांडला आहे.


महान असुर संस्कृती, त्यांची सभ्यता, भव्य वास्तू, शिव, विष्णू आणि गणपती या दैवतांची मंदिरे, हत्ती व सिंहासारख्या केवळ भारत व आफ्रिकेत आढळणाऱ्या प्राण्यांचे या ठिकाणी असलेले महत्व, प्राचीन मुद्रांवर अंकित असलेल्या बळी, वामन, बुद्ध आणि कृष्णाच्या प्रतिमा व तेलुगू भाषेशी साधर्म्य असलेली लिपी आणि उच्चार हे दक्षिण अमेरिकेतील आदिवासी समाजात आजही अनुभवता येते. हिरण्य कश्यपूची राजधानी ही सध्याच्या आंध्र प्रदेशात होती, असेही अभ्यासक मानतात, हे येथे नमूद केले पाहिजे. बहुजन आणि सवर्ण हा आत्ताच्या काळात नामशेष होऊ पाहणारा संघर्ष पुन्हा पेटवण्यासाठी काही समाज द्रोही बळी राजा आणि तत्सम महान विभूतींना देखील बदनाम करू पाहात आहेत. द्रविड अस्मितेच्या भोंगळ संकल्पनेने आज दक्षिण भारतात उभी केलेली सामाजिक आणि राजकीय दरी देशाला कोठे घेऊन जाणार हे आपण बघतोच आहोत.


तेव्हा फुले - आंबेडकरांच्या चिकित्सक महाराष्ट्राने तरी कोणाच्या मागे जायचे हे ठरवायची वेळ आली आहे.आता प्रश्न उरतो की, हा शेतकरी समाजाला आपलासा वाटणारा बळी राजा कोण असावा? त्याचेही उत्तर आपल्या प्राचीन इतिहासात दडलेले आहे. शेष नागाचा द्वापार युगातील अवतार, संकर्षण या नावाने प्रसिद्ध तो कृष्णाचा ज्येष्ठ भ्राता बलराम हाच खरा बळी राजा. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी ज्याने आपल्या नांगराने यमुनेचे पाणी ओढून नेले (कालवे बांधले), जो गोपालां मध्ये लहानाचा मोठा झाला संस्कृतातील बल रामचा भाबड्या शेतकऱ्यांच्या प्रेमाने त्याला बळी राजा म्हणायला सुरुवात केली असावी आणि पुढे हा आणि तो बळी राजा यांच्यात गल्लत झाली (किंवा केली) असावी. याउलट बळी राजाचे आहे. कोणत्याही पुराणात किंवा कथानकात बळी राजा शेती करतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी अमके करतो किंवा नांगर आणि अन्य आयुधे धारण करतो, असे दाखविलेले नाही. याउलट बल राम हा उग्रसेन व वसुदेवानंतर (श्रीकृष्ण आणि बल रामाचे पिता) द्वारकेचा राजा होता. यादवांचे गणराज्य होते. ते आपला राजा किंवा नेता प्रतिनिधी सभेतून निवडत असत. विशेष म्हणजे तत्कालीन संपूर्ण भारताच्या राज कारण व समाज कारणाचे केंद्र असलेला कृष्ण हा कधीच राजा झाला नाही. त्याचा ज्येष्ठ बंधू बलराम हाच राज पदावर बसला होता. त्यामुळे बल राम हा शेतकरी व पशुपालक अशा यादव समाजाचा नेता या अर्थाने पुढे बळी राजा म्हणून मान्यता पावला असावा. थोडक्यात वामन कालीन बळी राजा हा सुद्धा एक वैदिक राजा आणि क्षत्रिय वर्णाचा होता. असुर हे देखील अंतिमत: देवांचे सहोदरच आहेत.

क्रमशः..

Previous article
Next article

Leave Comments

Post a Comment

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel